कृषी पर्यटनाचे गाव “तापोळा”

तापोळा – कृषी पर्यटनाचे केंद्र

tapola agri tourism center 

महाबळेश्वरपासून 27 किमीच्या अंतरावर असणार तापोळा हे गाव ‘कृषी पर्यटनाचे केंद्र’ म्हणून उदयास येत आहे. गावाला लाभलेल्या नैसर्गिक संपन्नतेमुळे व समृद्धीमुळे तापोळ्याला  ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. चहूदिशांना मोठमोठे डोंगर, डोंगराच्या पायथ्याला असलेल्या विस्तीर्ण कोयनेचा जलाशय, घनदाट झाडी आणि निसर्गसंपन्न जंगल नागमोडी वळणाच्या वाटा असं निसर्गाचं भरभरून योगदान या परिसराला लाभलं आहे.

जल, जंगल आणि डोंगराच्या कुशीत तापोळा गाव वसले आहे.

तापोळा कृषी पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास येण्यामागची पार्श्वभूमी –

Background to the emergence of Tapola as an agro-tourism hub –

कोयना धरणाच्या बांधकामाला सुरुवात 1956 मध्ये झाली. धरणामुळे परिसरातील स्थानिकांच्या शेत जमिनी गेल्या. त्यामुळे कोयना नदीच्या काठावरील काही गावे विस्थापित झाली. जलाशयाच्या खाली आलेली  गावे कोयनेच्या काठावर वसवण्यात आली. त्यापैकीच तापोळा हे एक गाव. सुपीक जमिनी  पाण्याखाली गेल्याने केवळ गावातील  डोंगर उतारावरची उंच-सखल शेती तेवढी शिल्लक राहिली. त्याचा परिणाम म्हणजे स्थानिक तरुणांना रोजगाराची माध्यमे कमी झाली. रोजगार निर्मितीसाठी तरुण नवनवीन पर्याय शोधू लागले. त्यातूनच कृषी पर्यटन या नवीन व्यवसायाला सुरुवात झाली. तापोळा कृषी पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास येण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे.

निसर्गरम्य वातावरणात अनेक कृषी व रिव्हर कॅम्प पर्यटन केंद्र आहेत.

कृषी पर्यटन या व्यवसायाकडे तरुणांना वळवण्यासाठी  नाबार्डचे मोठे योगदान लाभले आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी शहराकडे छोट्याशा नोकरीसाठी न जाता गावातच व्यवसाय करावा यासाठी तापोळा गावातील तरुणांसाठी नाबार्डने एक महिन्यासाठी कृषी पर्यटनाविषयी माहिती देणारे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. नाबार्डच्या या शिबिराने  तरुणांना केवळ व्यावसायिक दिशा दिली नाही तर त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ तसेच महत्वाच्या परवानगी मिळवून दिल्या. यातूनच गावच्या तरुणांना रोजगारासाठीचे एक नवीन माध्यम उपलब्ध झाले.

तापोळा या गावात पर्यटकांसाठी सर्वं कृषी पर्यटन केंद्र पर्यावरण पूरक असे राहण्याची व्यवस्था केली आहेत.

तापोळा गावात आता हा व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला असून 600 लोकसंख्या असलेल्या या गावात आजमितीला जवळपास 15-16 कृषी पर्यटन केंद्र सुरु झाली आहेत. या पर्यटन केंद्रांची  वैशिष्ट्ये म्हणजे बहुतांश केंद्रे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या काठावर वसलेली आहेत.शिवाय याच परिसराच्या जवळ वासोटा किल्ला, दत्तमंदिर यांसारखी पर्यटन ठिकाणेही जवळ आहेत. तापोळा परिसरात अजूनही कृषी पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. महाबळेश्वरला पॉईंट पाहून कंटाळलेल्या पर्यटकांसाठी तापोळ्यातील कृषी पर्यटन केंद्रे एक चांगला पर्याय ठरत आहेत. 

article by Supriya Thorat.

Leave a Reply